वारसाहीन हिंदू विधवेला, पित्याकडून मिळालेली संपत्ती.
२४. वारसाहीन हिंदू विधवेला, पित्याकडून
मिळालेली संपत्ती :
वाचा : हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १५(२)(अ) ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
यमुनाबाई ही गावातील विधवा स्त्री
खातेदार विनाआपत्य मयत झाली. तिच्या मयत पतीचा लहान भाऊ यशवंतराव, वारसासंबंधी कागदपत्रे
घेऊन तलाठी कार्यालयात आले आणि मयत यमुनाबाईला अन्य कोणी वारस नसल्यामुळे त्यांचे
नाव वारस सदरी लावावे म्हणून लेखी अर्ज दिला.
तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना
६ क मध्ये नोंद घेतली. स्थानिक चौकशी केली तेव्हा त्यांना असे कळले की, यमुनाबाईला
जवळचे कोणीही वारस नाही. फक्त त्याच्या मयत पतीचा भाऊ हाच एकमेव नातेवाईक आहे. तथापि,
यमुनाबाईच्या नावे असलेली मिळकत ही यमुनाबाईला तिच्या पित्याकडून वारसाने
मिळालेली आहे.
मुदत कालावधी संपल्यानंतर वारस ठरावावर
निर्णय घेतांना तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकारी यांना ही गोष्ट सांगितली व
संबंधित कागदपत्रे व पुरावे सादर केले. मंडलअधिकारी अनुभवी होते, त्यांनी संबंधीत
वारस ठराव रद्द केला.
तलाठी भाऊसाहेबांनी जेव्हा मंडलअधिकारी
यांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तलाठी भाऊसाहेबांची जिज्ञासा खालील
प्रमाणे दूर केली. ते म्हणाले,
'हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १५(२)(अ)
अन्वये ज्या हिंदू स्त्रिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने संपत्ती मिळालेली असते, अशी स्त्री मयत
झाल्यास, तिची
संपत्ती, त्या मृत स्त्रिच्या मुले/मुली (पूर्व मृत मुलगा/मुलगी किंवा त्याची अपत्ये यांसह) यांच्याकडे जाते. मृत स्त्री,
विना आपत्य मरण पावल्यास तिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने मिळालेली संपत्ती तिच्या पित्याच्या वारसांकडे
प्रक्रांत होते. अशी तरतुद आहे. यमुनाबाई ही विधवा खातेदार, विनाआपत्य मयत झाली
आहे, उपलब्ध पुराव्यांवरून असे सिध्द होत आहे की, यमुनाबाईच्या नावे असलेली
मिळकत ही यमुनाबाईला तिच्या पित्याकडून वारसाने मिळालेली आहे. त्यामुळे अशा
संपत्तीवर यमुनाबाईच्या मयत पतीच्या भावाचा वारसाधिकार असणार नाही त्यामुळे त्यांच्या
अर्जाचा विचार करता येणार नाही. यमुनाबाईच्या माहेरी याबाबत कळवण्याची व्यवस्था
करावी.'
Comments