मयत हिंदू स्‍त्रिचे मृत्‍यूपत्र


 

मयत हिंदू स्‍त्रिचे मृत्‍यूपत्र

 

वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, १९९४, २००५ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.

 

सावित्रीबाई ही गावातील स्‍त्री खातेदार मयत झाली. तिला मनोज, अनिल आणि सुनिल अशी तीन मुले असून तिचे पती मयत होते. वारसाहक्‍काने आणि वाटणीमध्‍ये मिळालेली बरीच जमीन सावित्रीबाईच्‍या नावे होती. काही कौटुंबिक कारणांमुळे, सावित्रीबाईने, तिच्‍या हयातीत मृत्‍यूपत्र करून, स्‍वत:च्‍या नावे असणारी सर्व मिळकत सुनिलच्‍या नावे केली होती.

सावित्रीबाईच्‍या मृत्‍यूनंतर सुनिलने, मृत्‍यूपत्रानुसार त्‍याचे नाव वारस सदरी लावावे म्‍हणून तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर केला.

कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली.

ही माहिती मनोज आणि अनिल कळताच त्‍यांनी तलाठी यांच्‍याकडे सदर वारस नोंदीवर लेखी हरकत दाखल केली. तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यांना तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

सुनावणीच्या दिवशी सुनिलने, मृत्‍यूपत्र व इतर कागदपत्रे सादर करुन, त्‍याचे नाव सावित्रीबाईच्‍या मिळकतींना वारस म्‍हणून दाखल करण्‍याची विनंती केली.

मनोज आणि अनिलने, ते दोघेही सावित्रीबाईचे वारस असून त्‍यांचे नावही सावित्रीबाईच्‍या मिळकतींना वारस म्‍हणून दाखल करण्‍याची विनंती केली.

मंडलअधिकारी सर्व हितसंबंधीतांचे म्हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला,

"हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १४ अन्‍वये हिंदू स्‍त्रिच्‍या मालमत्तेची व्‍याख्‍या खालील प्रमाणे केलेली आहे.

ñ'या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्‍त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्‍काने, मृत्‍यूपत्रिय दानाने, वाटणीमध्‍ये पोटगी म्‍हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्‍वत:च्‍या कौशल्‍याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्‍त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे.'

ñ हिंदू उत्तराधिकार (महाराष्‍ट्र सुधारणा) कायदा १९९४, कलम २९-क-(दोन) अन्‍वये हिंदू कुटुंबामधील कन्‍येलाही, वाटणीच्‍या वेळेस पुत्राला वाटून देण्‍यात येत असलेल्‍या हिस्‍स्‍याइतका हिस्‍सा मिळेल.

ñ हिंदू उत्तराधिकार (महाराष्‍ट्र सुधारणा) कायदा १९९४, कलम २९-क-(तीन) अन्‍वये उपरोक्‍त प्रमाणे हिस्‍सा मिळालेली स्‍त्री, त्या हिस्स्याबाबत मृत्यूपत्रद्‍वारे किंवा अन्‍य प्रकारे अशा मिळकतीची विल्‍हेवाट सुध्दा लावू शकेल.

हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम-२००५ अन्‍वये हिंदू उत्तराधिकार अधिनियम- १९५६ च्‍या

कलम ६ मध्‍ये सुधारणा करुन हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम-२००५ कलम ६(१)(ब) अन्‍वये सहदायिकीतील मालमत्तेमध्‍ये तिला पुत्राप्रमाणेच सर्व अधिकार असतील. ६(१)(क) अन्‍वये सहदायिकीतील मालमत्तेमध्‍ये कन्‍येलाही पुत्राप्रमाणेच सर्व अधिकार, दायित्‍वे, प्राप्‍त होतील या प्रकारच्‍या कायदेशीर तरतुदी आहेत.

त्‍यामुळे सावित्रीबाईने तिच्‍या मिळकती मृत्‍यूपत्राने सुनिलला बहाल करण्‍यात कोणतीही कायदेशीर बाधा येत नाही. सबब सावित्रीबाईच्‍या मृत्‍यूपत्रानुसार सुनिल सावित्रीबाईचा कायदेशीर वारस असल्‍याचा ठराव करण्‍यात येत आहे. जरूर तर जाब देणार यांनी दिवाणी न्‍यायालयातून त्‍यांचा वारस हक्‍क सिध्‍द करून घ्‍यावा."     


Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send