विवाहित मुलींचे नाव वारस म्हणून डावलणे


 

विवाहित मुलींचे नाव वारस म्हणून डावलणे

 

वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६ ; हिंदू वारसा (महाराष्‍ट्र सुधारणा) कायदा २००५ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.

 

हिंमतराव हे गावातील खातेदार मयत झाले. त्‍यांचा मोठा मुलगा विनायकराव वारसासंबंधी कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात आला आणि वारसासंबंधी लेखी अर्ज आणि इतर कागदपत्रे सादर केली.

तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली. स्थानिक चौकशी केली तेव्‍हा त्‍यांना असे कळले की, मयत हिंमतराव यांना सुमन नावाची एक विवाहित मुलगी होती, तिचे नाव विनायकरावांनी सादर केलेल्‍या वारसासंबंधी अर्जात नव्‍हते.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यांना ही गोष्‍ट त्‍यांना सांगितली. मंडलअधिकारी अनुभवी होते, त्‍यांनी यांनी तलाठी भाऊसाहेबांची जिज्ञासा खालील प्रमाणे दूर केली. ते म्‍हणाले,

"अनेकवेळा विवाहित मुलींची नावे वारस म्हणून डावलली जातात. त्‍यामुळे वारसांची नावे दाखल करतांना आपण सखोल चौकशी करणे अत्‍यावश्‍यक आहे. वारस डावलणे हे बेकायदेशीर तर आहेच तसेच तो सामाजीक अपराध आहे असे मी मानतो. अशा प्रकरणात अर्जदाराला विवाहित मुलींबाबत विचारल्‍यास, त्‍याचे म्हणणे असते की, ‘मुलीच्या लग्नात आम्ही खर्च केलेला आहे. विवाहामुळे ती आता परकी झाली आहे. त्यामुळे आता तिचे नाव वारस म्हणून दाखल करण्याची आवश्यकता नाही.’ परंतु ही बाब अयोग्य आहे. मुलीच्या लग्नात खर्च केला म्हणून तिचा कायदेशीर वारस हक्क संपुष्टात येत नाही.

वारस दाखल करण्‍यासाठी अर्ज आल्‍यास खालील कागदपत्रे अर्जदाराकडून आवर्जून घ्‍यावीत.

ñ मयताच्या मृत्युचा दाखला- हा महत्‍वाचा कायदेशीर पुरावा आहे. यावरुन मृत्युचा दिनांक कळतो. हा पुरावा काही वेळेस उपलब्‍ध नसल्‍यास इतर अनुषंगिक पुरावे, जाब-जबाब घेऊन खात्री करावी.   

ñ मयताच्या मिळकतीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा उतारा – यावरुन मयताचे नाव कोणत्‍या अधिकाराने गावदप्‍तरी दाखल होते हे कळते.

ñ सदर मिळकत खरेदी केल्याचा फेरफार किंवा मयताचे नाव सदर मिळकतीवर कसे लावले गेले याबाबतचा फेरफार- यावरुन मयत खातेदाराच्‍या नावे मिळकत कोणत्‍या प्रकारे (खरेदी/वारस/अन्‍य) तबदिल झाली ते कळते.  

ñ सर्व वारसांची नावे नमूद असणारा अर्ज- यावरुन अर्जदाराने नमूद केलेली वारसांची नावे कळतात.    

ñ अर्जदाराकडून शपथेवर स्वयंघोषणापत्र घ्‍यावे त्‍यात शेवटी, अर्जात नमूद वारसांव्यतिरिक्त मयताला अन्य कोणीही वारस नाही, अन्‍य वारस आढळल्‍यास मी, भा.दं.सं. १८६०, कलम १९३, १९९, २०० अन्‍वये दोषी ठरेन याची मला कल्‍पना आहे.असे नमूद करुन घ्‍यावे. यामुळे अर्जदारावर कायदेशीर बंधन येते व भविष्‍यात याबाबत काही खोटे आढळल्‍यास त्‍याच्‍याविरुध्‍द कायदेशीर कारवाई करता येते. 

ñ अशा मिळकतीबाबत न्यायालयात काही वाद सुरु असतील, न्यायालयाने जर 'स्थगिती' आदेश किंवा 'जैसे थे' आदेश दिला असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती किंवा तसे नसल्‍याबाबत स्वयंघोषणापत्र घ्‍यावे.

ñ मयताच्या कुटुंबाची शिधापत्रिका- यामुळे कुटुंबातील सर्व सदस्‍यांची नावे कळतात. जरूर तर आपल्‍याकडील 'संदर्भ रजिस्‍टर' वरुन पडताळणी करावी.

ñ मयत खातेदाराचा खाते उतारा (आठ-अ)- यावरुन मयताच्‍या नावावरील सर्व शेतजमीनी कळतात.

तसेच बर्‍याच वेळा असे दिसून येते की, मयताच्या वारसांपैकी फक्त पुरुषांची नावेच सात-बाराच्या कब्जेदार सदरी नोंदवली जातात आणि महिलांची नावे (पत्नी, विवाहित/अविवाहित मुली इत्यादी) इतर हक्कात नोंदवली जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची आहे. हिंदू वारसा कायदा १९५६ मधील सन २००५ च्या सुधारणेनुसार मुलींनाही, मालमत्तेत मुलांइतकाच हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. मयताच्या वारसांपैकी महिलांची नावे सुध्दा कब्जेदार सदरीच नोंदवावी. इतर हक्कातील नावे पुनर्लेखनाच्‍यावेळेस नजरचुकीने गाळली जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशी बाब लक्षात न आल्‍यास कायदेशीर वारसावर अन्‍याय होतोच शिवाय कायदेशीर गुंतागुंत वाढते. आता सुमनचे नावही वारस रजिस्‍टरला नोंदवा आणि वारस ठराव मंजूर करुन घ्‍या."

वरील विवेचनामुळे तलाठी भाऊसाहेबांना वारस नोंदीचे गांभीर्य कळले.  


Comments

Archive

Contact Form

Send