दुसर्याच्या शेतातून पाईपलाईन टाकणे
९१. दुसर्याच्या शेतातून पाईपलाईन टाकणे :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४९.
अमोलला त्याची शेतजमीन बागायत करण्यासाठी लगतच्या विश्वासरावांच्या शेतजमिनीतून पाण्याची
पाईपलाईन टाकणे आवश्यक होते. लगतच्या शेतकर्याच्या
शेतातून पाईपलाईन नेण्यासाठी काय करावे याची माहिती घेण्यासाठी,
अमोलने तलाठी भाऊसाहेबांची भेट घेतली.
तलाठी भाऊसाहेबांनी
अमोलला माहिती दिली की,
लगतच्या शेतकर्याशी
असलेले संबंध सामंजस्याचे असतील तर अशी पाईपलाईन नेण्यात अडचण येत नाही. जर काढण्यास कोणाचीही हरकत नसेल तर वाद निर्माण
होत नाहीत व अशा प्रकरणी कोणत्याही परवानगीचा देखील प्रश्न उद्भवत नाही. तथापि, लगतचा शेतकरी पाईपलाईन नेण्यासाठी अडथळा निर्माण करत असेल तर अडचण होते.
अशी पाईपलाईन नेण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४९ मध्ये आणि महाराष्ट्र जमीन महसूल
(पाण्याचे पाट बांधणे) नियम १९६७ अन्वये तरतुद केलेली आहे.
या अंतर्गत, ज्या शेतकर्याला दुसर्या शेतकर्याच्या शेतजमीनीतून, स्वत:च्या शेतापर्यंत पाईपलाईन किंवा पाण्याचा पाट बांधण्याची इच्छा असेल, त्याने विहीत नमुन्यामध्ये, पाईपलाईन कशी टाकणार याचा कच्चा नकाशा व सात-बारा उतारा जोडून
तहसिलदाराकडे अर्ज करणे आवश्यक
असते. असा
अर्ज मिळाल्यानंतर तहसिलदार सर्व संबंधितांना नोटीस काढून त्यांना आपले म्हणणे
मांडण्याची संधी देतात. शेजारच्या शेतकर्याची हरकत असेल तर हरकतीचे मुद्दे तपासले जातात. अर्जदाराची गरज विचारात घेऊन पाईपलाईन टाकण्याची किंवा पाण्याचा पाट बांधण्याची परवानगी दिली जाते.
अशी परवानगी देतांना, शेजारच्या शेतकर्याचे
कमीतकमी नुकसान होईल अशा पध्दतीने पाट टाकावे, पाट किंवा पाईपलाईन
ही जवळच्या अंतराने टाकावी, पाण्याच्या पाटाची रुंदी ही
किमान आवश्यक आणि कोणत्याही बाबतीत दिड
मिटरपेक्षा जास्त असू नये, पाईप
लाईन टाकतांना ती किमान अर्ध्या मिटरपेक्षा
जास्त खोलीवर टाकावी, शेजारच्या शेतकर्याला वाजवी भाडे द्यावे आणि पाईपलाईन टाकतांना तसेच तिची दुरुस्ती करतांना
कमीतकमी जमीन खोदली जाईल तसेच खोदलेली जमीन अर्जदाराने पुन्हा स्वखर्चाने पुर्ववत करावी अशा अटी लादल्या जातात.
पाट
किंवा पाईपलाईन टाकतांना जर शेतात उभी पिके असतील तर त्यांना
कमीतकमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घ्यावी, तरीही पिकांचे नुकसान झाल्यास, नुकसान
भरपाई देण्याची जबाबदारी अर्जदाराची असते, अशी नुकसान भरपाई देण्यात कसूर करण्यात आला तर ती रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करता येते.
पाईपलाईनबाबत
किंवा पाण्याच्या पाटाबाबत तहसिलदारानी दिलेल्या आदेशाविरुध्द अपील करता येत नाही तथापि, यात जर अन्याय झाला असेल तर जिल्हाधिकार्यांकडे दाद मागता येते.
अस्तित्वात
असलेले पाण्याचे पाट किंवा पाईपलाईनला कोणी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीत
शेतकर्याने तहसिलदाराकडे दाद मागावी. जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४९(१०) अन्वये अशा नुकसानीसाठी दंडाची तरतुद आहे.
Comments