आणेवारी म्‍हणजे वाटप नाही

 


८३. आणेवारी म्‍हणजे वाटप नाही :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५, १४९ व १५०.

 

गावात एका शेतजमिनीत, राजेश, विनोद आणि सुरेश या तीन भावांच्‍या नावे सात-बारा सदरी प्रत्‍येकी ५ आणे ४ पै आणेवारीने दाखल होती. त्‍यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्‍वये तहसिलदारांसमोर वाटप करुन घेतले.

वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

राजेश, विनोद आणि सुरेश सहीसाठी चावडीत आले तेव्‍हा मंडलअधिकारीही तेथे आलेले होते.

सुरेशने तक्रारीच्‍या स्‍वरात मंडल्रधिकार्‍यांना विचारणा केली की, आमच्‍या शेतजमिनीच्‍या सात-बारा सदरी आधीच प्रत्‍येकी ५ आणे ४ पै आणेवारीने दाखल आहेत. मग पुन्‍हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्‍वये वाटप करुन घ्‍यायचे कारण काय?

मंडल्रधिकार्‍यांनी खुलासा केला की, सात-बारा सदरी आणेवारीने दाखल असणे म्‍हणजे आपोआप वाटप झाले असे म्‍हणता येत नाही. अशा आणेवारीला, फारतर 'कौटुंबिक व्‍यवस्‍था' म्‍हणता येईल (ए.आय.आर. १९९२, मुंबई ७२). वाटप म्‍हणजे मिळकतीचे सरस-निरस मानाने तुकडे पाडून माप आणि सीमांकनाने (Metes & Bounds) तुकडे करणे. पूर्वी आणेवारीने तुम्‍ही आपसात 'कौटुंबिक व्‍यवस्‍था' ठरविली होती, आता कलम ८५ अन्‍वये वाटप करुन सरस-निरस मानाने, माप आणि सीमांकनाने जमिनीच्‍या हद्‍दी ठरवून घेतलेल्‍या आहेत.      

सुरेशची तक्रार दूर झाली आणि सर्वांनाच आणेवारी आणि वाटपातील फरक लक्षात आला.


Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send